नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाला आर्थिक चालना मिळण्यासाठी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. त्यासंदर्भातील वितरण आणि योजनांची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून केल्या जात आहेत. आजही पत्रकार परिषद निर्मला सीतारामन पुढील योजनांची घोषणा करणार आहेत. त्यामुळे आज कोणत्या घटकाला प्रधान्य दिलं आहे, पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बुधवारी सूक्ष्म, लघू, मध्यम तसेच कुटीर व गृहउद्योगांबाबत अनेक घोषणा केल्या. यासाठी केंद्र सरकारने मोठी आर्थिक पुंजी पुरवली आहे. तर लघु उद्योगाच्या मर्यादेत बदल करून ही मर्यादा ५ कोटी एवढी करण्यात आली आहे. त्यामुळे आता ५ कोटी उलाढाल असणाऱ्या उद्योगांना लघु उद्योगम्हणून ग्राह्य धरले जाणर आहे.
दरम्यान यावर कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे. हे तर ठिगळांचे पॅकेज आहे फारसे उपयोगी पडणार नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. चव्हाण म्हणाले की, पंतप्रधानांनी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा केल्याने नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र, पहिल्या दोन दिवसांमध्ये जाहीर झालेल्या पॅकेजमध्ये प्रत्यक्ष मदतीपेक्षा घोषणा अन् आकड्यांचाच मारा अधिक दिसून येतो.
कृषी कर्जाचे वितरण, शेतमाल खरेदीसाठी निधी, सहकारी व ग्रामीण बॅंकांसाठी नाबार्डचा निधी या बाबी दरवर्षीच्याच आहेत. मनरेगाची मजुरी वाढवण्याचा निर्णयही या अगोदरच झाला आहे. अशा घोषणा पॅकेजशी जोडून केंद्र सरकार देशाची दिशाभूल करीत आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
