नवी दिल्ली : भारतात कोरोनाबाधितांची संख्या आता 59 हजरांवर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे काही ठिकाणी भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नका भारत सरकार या महामारीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे, असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे.
ते म्हणाले की, इतर विकसित देशांप्रमाणे आपल्याकडे परिस्थिती अत्यंत गंभीर होण्याची शक्यता आम्हाला वाटत नाही. मात्र तरीही गंभीर परिस्थितीला तोंड देण्याच्या दृष्टीने आम्ही पूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. फक्त प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करावे.
कशी आहे देशात कोरोनाची परिस्थिती ?
करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात ३३२० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर ९५ जणांचा करोनाने बळी घेतला आहे. देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता ५९ हजार ६६२ वर पोहचली आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले ३९ हजार ८३४ रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले १७ हजार ८४७ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १९८१ जणांचा समावेश आहे.
दरम्यान जगातील इतर देशात कोरोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत जगात 40 लाख 28 हजार 547 एवढे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर त्यापैकी 2 लाख 76 हजार दगावले आहेत. सुदैवाची बाब म्हणजे या कोरोना वायरस वर आतापर्यंत 13 लाख 94 हजार जणांनी विजय मिळवला असून उपचार घेऊन घरी गेले आहेत.

