जळगाव : विधान परिषदेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नियुक्त करण्यास राज्यपालांनी नकार दिल्याने निर्माण झालेल्या तिढय़ावर अखेर निवडणूक आयोगाने मार्ग काढला आणि २१ मे रोजी विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने मुदतीत आमदार होण्याचा ठाकरे यांचा मार्ग मोकळा झाला.
महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी परवानगी दिली. करोनासंदर्भातील सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करून ही निवडणूक होत आहे.विधान परिषदेच्या नऊ जागा २४ एप्रिल रोजी रिक्त झाल्या होत्या. करोनाच्या आपत्तीमुळे राज्यसभा तसेच विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला विधान परिषदेची निवडणूक घेण्याची विनंती केली. सध्या अमेरिकेत असलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दूरचित्र संवादाद्वारे चर्चा करून २७ मेपूर्वी निवडणूक घेण्याचा निर्णय जाहीर केला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सक्रिय राजकारणापासून दूर असलेले माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा चर्चेत आले आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी आपण इच्छुक असल्याचं एकनाथ खडसे यांनी स्वत: बोलून दाखवलं आहे.
एकनाथ ता खडसेंच्या सुरात सूर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मिसळला आहे. एका वृत्तानुसार,विधानपरिषदेवर पक्षाने नाथाभाऊंना निश्चित संधी दिली पाहिजे. ते आमचे अनुभवी नेते आहेत. जर त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली तर पक्षाला निश्चित फायदा होणार आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांचा नावाचा विचार केला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पक्ष आता कुणाला संधी देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

