मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
मात्र, अनेक ठिकाणी गर्दी आटोक्याबाहेर गेल्याच चित्र समोर आलं आहे. त्यामुळे नक्की संचारबंदी आहे की नाही ? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भाजीपाला, किराणा व इतर आवश्यक सुविधा सुरु ठेवण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील नागरिक किराणा दुकानाबाहेर, भाजी मार्केटमध्ये, लोकलमध्ये मोठी गर्दी करत असल्याने नियम अधिक कठोर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांनी यापूर्वीच कडक लॉकडाऊनचे संकेत दिलेले होते. परंतु आता कॅबिनेट बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गर्दी कमी होत नसल्याने राज्य शासनाने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. किराणा दुकान, भाजीपाला, फळविक्री, दूध विक्री दुकान (डेअरी), चिकन, मटण, मासे विक्री, खासगी वाहनांसाठी पेट्रोल पंप, कृषी संबंधित सेवा, पशुखाद्याची विक्री करणारी दुकानं सकाळी 7 ते 11 याच वेळेत खुली राहतील.सकाळी 11 वाजता दुकाने बंद झाल्यानंतर रात्री 8 वाजेपर्यंत या दुकानांद्वारे घरपोच सुविधेला मात्र परवानगी असेल असं सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. नव्या नियमावलीनुसार धार्मिक स्थळं, आठवडी बाजार, दारुची दुकानं, सर्व खासगी कार्यालये, सलून, ब्यूटी पार्लर, चहाची टपरी, स्टेडियम, मैदाने, सिनेमागृह, नाट्यगृह, कोचिंग क्लासेस पूर्णत: बंद राहतील. या आदेशाची अंमलबजावणी 20 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

