पनवेल : लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई, पनवेल तालुक्यात अडकलेल्या मध्यप्रदेश राज्यातील 1200 कामगारांना विशेष रेल्वेने मध्यप्रदेशमधील भोपाळ इथे पाठवण्यात आले. रेल्वेत बसण्यापूर्वी या सर्व व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून मध्यप्रदेश येथे जाण्यासाठी त्यांचे आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे.
या सर्वांना नवी मुंबई, पनवेल तालुक्यातील विविध भागामधून पनवेल रेल्वे स्टेशन येथे बसने आणण्याची व्यवस्था विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी केली होती. मध्यप्रदेश शासनाने या कामगारांची रेल्वेने जाण्याचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. रेल्वेने जाणाऱ्या या सर्वांसोबत जेवणाचे पार्सलही देण्यात आले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करत अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने या प्रवाशांना रेल्वेत बसवण्यात आले.
दरम्यान, कोविड१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नामुळे, भारत आत्तापर्यंत कोरोनाचा सामुदायिक प्रसार रोखण्यात यशस्वी ठरला असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. आजवर देशात देवी आणि पोलिओ सोडून इतर कोणताही साथीचा आजार समूळ नष्ट झालेला नाही. ते परत येत राहतात असं सांगत त्यांनी कोरोनाचा दीर्घकाळ अस्तित्वात राहण्याची शक्यता व्यक्त केली.
देशात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची गती स्थिर असली तरी, वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय असल्याचं मत दिल्लीतल्या एम्सचे संचालक रणदीप गुलेरीया यांनी व्यक्त केलं आहे. अनेक तज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार भारत मे महिन्याच्या अखेरीस किंवा जुनच्या मध्यात रुग्णांच्या संख्येच्या सर्वोच्च टप्प्यापर्यंत जाऊ शकतो अशी शक्यता त्यांनी वर्तवली. ही बाब लक्षात घेऊन आपण अधिक सतर्क राहत रुग्ण संख्या कमी व्हावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

