🕒 1 min read
नवी दिल्ली : Covid -19 आजाराचा प्रसार रोखण्यासाठी, केंद्र सरकारनं आज मास्क वापरणं अनिवार्य करणं तसंच थुंकण्यावर पूर्ण बंदी घालणारे निर्देश जारी केले आहेत. सार्वजनिक तसंच कामाच्या ठिकाणीही मास्कचा वापर अनिवार्य आहे. ५ पेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर सरकारनं यापूर्वीच बंदी घातली आहे.
कामगारांसाठी सॅनिटायझर आणि ताप मोजणी करणं आवश्यक असल्याचंही सरकारनं जाहीर केलं आहे. कामगारांना सामाजिक सुरक्षित अंतर पाळून काम करता येईल अशी सोय व्यवस्थापन करावी तसंच कामगारांच्या दोन पाळ्यांमध्ये किमान एका तासाचं अंतर ठेवण्याची सुचना सरकारनं केली आहे.
दरम्यान, देशात आणि महाराष्ट्रात दररोज करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात मंगळवारी आणखी ३५० करोनाग्रस्त पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची रुग्णसंख्या २६८४ झाली आहे. दिवसभरात करोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला.
आत्तापर्यंत २५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जे १८ मृत्यू झाले त्यातले ११ मृत्यू मुंबईत झाले आहेत. देशात करोनाबाधितांची संख्या १० हजारच्या पुढे गेली असून आतापर्यंत ३५३ जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात १४०० करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

