नवी दिल्ली : करोनामुळे देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र यानंतर आधीच बेरोजगारीच्या संकटाशी झगडणाऱ्या आपल्या देशाला याच बेरोजगारीच्या आणखी मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी केंद्राने पॅकेज जाहीर करावं अशी मागणी खा. राहुल गांधी यांनी केली आहे. सध्या सरकारने काय केलं नाही काय करायला हवं होतं या सगळ्या चर्चांची वेळ नाही. सध्या एकजुटीने करोनाच्या संकटाचा सामना करायला हवा असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
ज्या स्पीडने पैसा पोहोचला पाहिजे त्या स्पीडने पैसा पोहोचत नाहीय. गरीबांना अन्नवाटप सुरु करा, गरीबांच्या खात्यात पैसा जमा करा, बरोजगारी येणार आहे. छोटया मध्यम उद्योगांच्या सुरक्षेसाठी पॅकेज तयार करा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वारे आज माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत माझे अनेक मतभेद असतील. पण या मतभेदांची ही वेळ नाही. आपण एकजुटीनंच याचा सामना केला पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं.
दरम्यान,आपल्या आर्थव्यवस्थेवर प्रचंड तणाव येणार आहे. मात्र या संकटाचा सामना करावाच लागणार. सध्याच्या घडीला माणसाचं आयुष्य वाचणं ही सगळ्यात मोठी गरज आहे. मात्र त्याचवेळी व्हायरस आपली अर्थव्यवस्था नष्ट करणार नाही याचीही काळजी आत्तापासून सरकारने घ्यायला हवी असंही राहुल गांधींनी स्पष्ट केलं.
पुढे बोलताना गांधी म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलत आहे. देश परदेशातील तज्ज्ञांची माझा संपर्क झाला आहे. मी जे काही बोलत आहे ते त्यांच्याशी झालेल्या चर्चेवर अवलंबून आहे. जोपर्यंत लॉकडाउन आहे तोवर करोनाचा व्हायरस थांबेल. परंतु जेव्हा पुन्हा लॉकडाउन संपेल तेव्हा हा करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा जाणवू लागेल. लॉकडाउन हा केवळ हा पॉझ बटनाप्रमाणे आहे. करोनाला हरवण्यासाठी केवळ लॉकडाउन पुरेसं नाही, असं मत क राहुल गांधी यांनी व्यक्त केलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

