🕒 1 min read
लातूर : लातूर जिल्हा कोविड-19 मुक्त आहे आणि हे स्वरूप आपणाला यापुढेही असेच कायम ठेवावयचे असल्याने जेथे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले जात नाही तेथे कठोरपणे कारवाई करण्यापलीकडे अन्य पर्याय उरणार नाही असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिला आहे.
कोविड -19 विरुद्धचा लढा आपणाला जिंकावयाचा असल्याने अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये. अतिशय गरज असल्यास कुटुंबातील केवळ एकाच सदस्याने बाहेर पडावे आणि जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य सेवेवरील ताण कमी करावा असे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.
लातूर जिल्हा कोविड-19 मुक्त राखण्याचे श्रेय लातुरकर नागरिकांना आहे असे सांगून जिल्ह्याचे हे स्वरूप आपणाला असेच ठेवावयाचे असल्याने कोणत्याही परिस्थितीत कोविड -19 चा प्रादुर्भाव जिल्ह्यात होणार नाही यासाठी जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांनी अधिक काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना त्यांना दिल्याचे सांगून यामुळे कोणाचीही गैरसोय होणार नाही असेही पालक मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
जनतेने अत्यावश्यक कामाशीवाय घराबाहेर पडू नये, कुठेही अनावश्यक गर्दी करू नये, सर्वत्र सामाजिक अंतर पाळावे. या कालावधीत दवाखाने, औषधाची दुकाने, किराणा दुकाने, रास्त भाव दुकाने या व अन्य अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार असल्याने याठिकाणीही सामाजिक अंतर काटेकोरपणे राखले जावे याची दक्षता घ्यावी, घरीच राहाल तर सुखी राहाल आणि तसे झाले तरच कोविड विरुद्ध सुरू असलेला हा लढा जिंकणे साध्य होणार असल्याने जनतेने साथ द्यावी असेही पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

