🕒 1 min read
मुंबई : ‘कोरोना’मुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी राज्य सरकारवर जहरी टीका केली आहे. ‘महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. येथे आरोग्य यंत्रणा चांगली आहे. तरीही येथील राज्य सरकार कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरले आहे,’ असं टोला राणे यांनी लगावला.
राणे यांनी याबाबत टीव्ही-9 या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘कोरोनाचा सामना करण्यासाठी केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांनी योग्य त्या उपाययोजना केल्या. मात्र महाराष्ट्र सरकार याबाबतीत कमी पडले. कोरोनाचे रुग्ण सापडलेल्या भागात योग्य ते उपाय केले नाहीत’.
पुढे ते म्हणाले, ‘या सरकारचे कौतुक सरकारमधील माणसेच करत आहेत. आणि या सरकारचं कौतुक का करायचं, कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले म्हणून का? असा सवाल राणेंनी उपस्थित केला.
दरम्यान, ‘राज्यातील सरकारची अवस्था एक ना धड भराभर चिंध्या अशी झाली आहे. त्यामुळे निर्णय घेण्यात सरकारला अपयश येत आहे,’ अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.


