🕒 1 min read
अहमदनगर : कोव्हीड-१९ अर्थात करोना संसर्गाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता हा संसर्ग आपल्याला होण्यापासून रोखण्यासाठी एकमेकात सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी बऱ्यापैकी होत असल्याचे चित्र सध्या नगर शहरात दिसत आहे.
यासाठी औषध व किराणा व्यावसायिकांनी आपली भूमिका लक्षात घेत, आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांना सोशल डिस्टन्स पाळण्याबाबत शिस्त अंगिकारण्यास भाग पाडले आहे. सर्वाधिक गर्दी असलेल्या भाजीपाला मार्केटमध्ये मात्र अजूनही पुरेशा गांभीर्याने सोशल डिस्टन्स विक्रेते व ग्राहक पाळत नाहीत. मनमाड व कल्याण रोडवरील शिवाजीनगर व नागापूर एमआयडीसी परिसरातील भाजी मंडईत ग्राहक मोठ्या प्रमाणात जमा झाल्याचे चित्र अजून नाहीसे व्हायला तयार नाही. मात्र सुदैवाने शहरातील भाजी बाजाराच्या ठिकाणी थोडीफार शिस्त दिसते.
सोशल डिस्टंसिंगच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने अनेक किराणा दुकानदार, दूध विक्रेते, भाजी विक्रेते, तसेच औषध विक्रीच्या दुकानांसमोर खडूने मार्किंग करून दिली आहे. दोन ग्राहकांमध्ये किमान अपेक्षित अंतर ठेवणे गरजेचे असल्याने. दीड फुटाच्या अंतरावर गोल करून तेवढे तरी अंतर पाळण्याचे आवाहनही महापालिकेने केले होते. त्याची अंमलबजावणी औषध विक्रेत्यांनी व किराणा विक्रेत्यांनी प्रभावीपणे केली. त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचना त्यांच्याकडून वारंवार दिल्या जातात. तसेच यावर शहरात फिरणारे विविध दलाचे पोलीस लक्ष ठेवून आहेत. व नियमित अंतर ठेवण्याची मागणी त्यांच्या द्वारे देखील केली जात आहे.


