औरंगाबाद : जगभरात कोरोनाचे थैमान घातले असताना शहरात मात्र सारीने थैमान घातला आहे. शहरात कोरोनाग्रस्त रुग्ण संख्या २६ आहे. तर सारीच्या रुग्णांची संख्या आता दोनशे पार गेली आहे. त्यामुळे कोरोना पेक्षा सारीचे मोठे संकट औरंगाबादवर ओढवले आहे. गेल्या २० दिवसात सारी मुळे १४ जण दगावले आहेत. संपूर्ण आरोग्य विभाग कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज झाल्यावर आता सारीने देखील डोके वर काढले आहे. सारी या आजाराची लक्षणे ही कोरोना सारखीच असतात. त्यामुळे या रुग्णाचे स्वाब घेऊन कोरोना तपासणी साठी पाठविण्यात येतात.
सारी बाबत माहिती देताना महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले की, नागरिकांनी ताप, सर्दी, खोकला या आजारांसाठी सारीसाठी उभारलेल्या तपासणी केंद्रांमध्येच यावे. इतर ठिकाणी जाऊ नये. आपण मनपाच्या या क्लिनिकमध्ये आल्यास आजाराचे निदान लवकर होईल व उपचार घेण्यासाठी देखील सोयीची होईल.
शहरात १२ ठिकाणी फिव्हर क्लिनिक
मनपाच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात बारा ठिकाणी सारी तपासणी साठी फिव्हर क्लिनिक उभारले गेले आहेत. तेथे ताप, खोकला, सर्दी झालेल्या रुग्णाची तपासणी करण्यात येते. मागच्या दोन दिवसात या क्लिनिक मध्ये दोनशे हुन अधिक जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील चार रुग्ण अधिक संशयित वाटल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील तपासणी व उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती घोडेले यांनी दिली.


