🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : साकोली विधानसभा मतदारसंघातील लाखांदूर तालुक्यामधील सिद्धिपीठ हनुमान मंदिरात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांनी नारळ वाढवून निवडणूक प्रचारास शुभारंभ केला. यावेळी सुनियोजित सभा, अतिशबाजी, ढोल-ताशांच्या गजरात डॉ. फुकेंचे स्वागत व सन्मान करण्यात आला.
लाखनी येथील पलसगाव, सुनारी, विहिरगाव, भूगाव – पंढरपूर, मेंढा, कोलारी / पट आणि घोडेझरी येथे धुवाधार निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत आमदार बाळाभाऊ काशिवार, शिवरामजी गिरेपुंजे, राजेशभाऊ बांते, पद्माकरभाऊ बावनकर, म.वा. बोडने गुरूजी, घनश्याम पाटील खेडीकर, मंगेशभाऊ मेश्राम यांच्यासह बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. फुके म्हणाले, आजतागायत साकोली भागात सुमारे 300 कोटींची विकास कामे केली. राज्यमंत्री आणि पालकमंत्री झाल्यानंतर मकरधोकडा येथील धानाच्या तनसापासून बायो-इथॅनॉल रिफायनरी ऑइल निर्मित करणारा प्रकल्प सुमारे 1500 कोटी रुपयात उभारला. नवेगाव-नागझिराला पर्यटनक्षेत्र घोषित करून विविध रोजगारासाठी 350 कोटी रुपयांचा डीपीआर उपलब्ध केला, विविध क्षेत्रात विकास कामे करून स्थानिक 30 हजार जनतेला रोजगार मिळवून दिला. पोलिस पाटीलांच्या प्रलंबित मानधन वाढिव प्रश्न, मच्छीमार समाजातील तलावाचे लीज माफ, आदिवासी, गोवारी व धनगर समाजाचे प्रश्न सोडविले. येणाऱ्या काळात भेल कारखाना वर्षभरात सुरू होत नसल्यास कंपनीकडून जमीन परत घेवून त्या ठिकाणी छोट्या उद्योगांचा विकास करणार असल्याचा मानस डॉ. फुके यांनी व्यक्त केला.
डॉ. परिणय फुके पुढे म्हणाले, साकोली क्षेत्रात विकास घडवून आणण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा सरकारी निधी उपलब्ध करून देणे हे माझे स्वप्न आहे. साकोली माझी कर्मभूमि असल्यामुळे या क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासाठी मी वचनबद्ध आहे. निवडणुकींचा काळ लक्षात घेऊन विकासाच्या नावाखाली काही लोक गावोगावी अपप्रचार करत आहेत. मागील 25 वर्षे सत्ता उपभोगून या क्षेत्रात शेतकऱ्यांना धान गोदाम, पानपट्टी, वीजपुरवठा यांसारख्या मूलभूत सेवा मिळू शकल्या नाही. मागील सत्ताधारी नेत्यांनी जातीच्या नावाखाली विकासाचे आमिष दाखवून दिशाभूल केली. तरी जनतेने मला विश्वासाने 12 दिवस मदत करावे व आपला आशीर्वाद द्यावा. पुढील पाच वर्षात साकोली क्षेत्राला प्रगती पथावर आणून विकास घडवून आणण्याचे वचन देतो. जनता ही सुज्ञ असून विकास घडविण्यासाठी आपले प्रतिनिधित्व कुणाला द्यायचे, हे सुद्धा जनताच ठरवेल असे मत डॉ. फुके यांनी व्यक्त केले.


