🕒 1 min read
उस्मानाबाद:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. पराभवातून काही गोष्टी घेण्यासारख्या असतील तर त्या निश्चितपणे घेऊ. भाजप आता महाविकास आघाडीचे सरकार कधी पाडणार हे सांगणार नाही, आम्ही थेट कृती करु. मात्र, आम्ही सरकार नक्की स्थापन करु, असे सूचक वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले आहे.
सरकार पाडण्यासंदर्भात बोलण्यापेक्षा आता कृतीवर लोकांचा जास्त विश्वास बसेल. त्यामुळे आम्ही सरकार पाडण्यासाठी आणखी किती महिने लागतील, हे सांगणार नाही. एका जत्रेने देव म्हातारा होत नाही. तसेच अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याची गरज नसते. अजून खूप निवडणुका बाकी आहेत, असा टोला प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.
दरम्यान, पुणे आणि नागपूर पदवीधर हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा पासून नागपूर पदवीधर हा भाजपकडेच होता. पण यंदा या दोन्ही मतदारसंघात भाजपला जबरदस्त हादरा बसल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सर्वत्र जल्लोष केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता डिसले गुरुजीं आमदार होणार? दरेकर करणार शिफारस
- मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी आता पाच वकिलांची समन्वय समिती
- संजय राऊत म्हणतात…’उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच आमचे डॉक्टर’
- पुणे जिल्ह्यातील ‘या’ भागात उद्यापासून कडक संचारबंदी!
- ‘सरकार आजचं दुखणं उद्यावर ढकलत आहे’; एमपीएससी परीक्षांच्या मुद्द्यावरून भाजप आमदाराचा निशाणा


